कोल्हापूर : श्रीक्षेत्र जोतिबा परिसर संवर्धन प्राधिकरणात विस्थापित होणार्या ग्रामस्थांची मते जाणून घ्या, त्यानंतर आराखडा सादर करा, अशा सूचना उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत शुक्रवारी देण्यात आल्या. वित्त विभागाचे अवर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रालयात बैठक झाली.
दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर आणि वाडी रत्नागिरी गावासह परिसरातील गावांचा विकास व्हावा, याकरिता श्रीक्षेत्र जोतिबा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणाद्वारे संपूर्ण परिसराच्या विकासासाठी 1 हजार 816 कोटी 11 लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे चार टप्प्यांत परिसराचा विकास केला जाणार आहे. जोतिबा मंदिर परिसराचा विकास करताना वाडी रत्नागिरी हे गाव नव्याने वसवण्यात येणार आहे.
या प्राधिकरणासाठी नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीसमोर शुक्रवारी आराखड्याचे सादरीकरण झाले. यावेळी विस्थापित होणार्या लोकांची मते जाणून घ्या. त्यानुसार आराखडा फेरसादर करा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. सुमारे पाऊण तास बैठकीत आराखड्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीला नियोजन विभागाचे अवर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह वन, पर्यटन विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.