

जयसिंगपूर : जयसिंगपूर शहरातील बाराव्या गल्लीत भटक्या कुत्र्यांच्या सुळसुळाटामुळे तिहेरी अपघात घडला. मोपेडवरून जाणाऱ्या महिलेवर ८ ते १० कुत्र्यांनी अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कुत्र्यांच्या तावडीतून बचाव करण्यासाठी महिलेने मोपेडचा वेग वाढवला. मात्र, नियंत्रण सुटल्याने तिने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दुचाकी आणि कारला जोराची धडक दिली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे जयसिंगपूर पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून काही दिवसांपूर्वीच स्टेशन रोडवरील एका वृद्ध महिलेचा रेबीजमुळे मृत्यू झाला होता. सर्वोच्च न्यायालयाचे कडक आदेश असूनही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सध्या शहरातील शाळा परिसरही असुरक्षित बनला असून लहान मुले, महिला आणि मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांवर कुत्र्यांचे सातत्याने हल्ले होत आहेत. पालिकेच्या या सुस्त कारभारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, प्रशासनाने तत्काळ ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.