

कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या जतन व संवर्धन कामात हलगर्जीपणा आणि चुकीचे काम झाले असल्यास, त्याची शहानिशा करून जबाबदार घटकांवर कारवाई करण्यात येईल. मंदिराचे काम दर्जेदार होण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न केले जातील, असा निर्णय जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. विजय राठोड यांनी जाहीर केला.
संवर्धनात धोकादायक पद्धतींचा अवलंब केला जात असल्याने शहर सर्वपक्षीय समिती, सामाजिक संघटना व इतिहास अभ्यासकांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत डॉ. राठोड बोलत होते. आमदार राजेश क्षीरसागर यांनीही जिल्हा प्रशासनाकडून मंदिरात झालेल्या सर्व कामाची पाहणी आणि चौकशी झाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे नमूद केले.
‘पुरातत्त्व’चे डॉ. वहाणे, तेजस गर्ग यांना हटवा
मंदिर कामात सुरू असणार्या सँड ब्लास्टिंगसह ग्राईंडर, ब्रेकरचा बेकायदेशीर वापर त्वरित थांबवण्याची मागणी करत पुरातत्त्वचे संचालक तेजस गर्ग आणि डॉ. विलास वहाणे यांना महाराष्ट्र शासनाने पदावरून बाजूला करावे आणि गुन्हा नोंदवावा, अशी मागणी समितीने लावून धरली. या मुद्द्यावरून बैठकीत गोंधळ झाला, तर सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीतच अधिकाऱ्यांना कोल्हापुरी पायताण दाखवले.