

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र सरकारने वसंतराव नाईक महामंडळ योजने अंतर्गत नागरी बँकांचा समावेश करून राष्ट्रीय बँकाच्या माध्यमातून धनगर समाजावर होत असलेला अन्याय थांबवावा. धनगर समाजास इतर महामंडळाप्रमाणे कर्ज पुरवठा करावा अशी मागणी यशवंत ब्रिगेड मार्फत करण्यात आली आहे. मंत्री अतुल सावे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची भेट घेऊन ही यंशवंत ब्रिगेड तर्फे ही मागणी करण्यात आली.
धनगर समाजातील युवकांना नव उद्योग सुरू करण्यासाठी दहा लाख कर्ज पुरवठा केला जातो. अन्य महामंडळ युवकांना पंधरा लाख कर्ज पुरवठा केला जातो. परंतु वसंतराव नाईक महामंडळ धनगर समाजातील युवकांना दहा लाख कर्ज पुरवठा करते. अन्य महामंडळने कर्ज पुरवठा करताना नागरी बँकांचा समावेश केला आहे. परंतु वसंतराव नाईक महामंडळने राष्ट्रीय बँकाची अट घातली आहे. राष्ट्रीय बँका अनेक अटी लाऊन कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे वसंतराव नाईक महामंडळ अंतर्गत नागरी बँकांचा समावेश व्हावा अशी मागणी करण्यात आली. यशवंत ब्रिगेडच्या पदाधिकारी यांनी मंत्रालयात जाऊन अतुल सावे व छगन भुजबळ यांची भेट घेऊन धनगर समाजास न्याय द्यावा अशी मागणी केली . न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी अमोल गावडे, प्रकाश पुजारी, श्रीकांत पुजारी, राजाराम तांबे, भगवान पुजारी, काशिलिंग पुजारी, संदीप पुजारी, सुरेश व्हटकर, अनिल पुणेकर, उमाजी तांबे, मुरारी पुजारी इ. समाज बांधव उपस्थित होते.