इचलकरंजी; विठ्ठल बिरंजे : इचलकरंजी शहरातील एकमेव जीवनदायिनी असलेल्या कृष्णा पाणी योजनेच्या पाठीमागे संकटांची साडेसाती हात धुवून लागली आहे. योजनेला गळती तर नित्याचीच आहे. कधी महावितरण, कधी ठेकेदार वणवा आणतात. त्यात आता वर्षभर शांत बसलेल्या पाटबंधारे विभागाची भर पडली आहे.
या सर्व कटकटीतून कायमचे मुक्त व्हायचे असेल तर किमान 20 कोटी रुपयांचा निधी तातडीने उभारण्याची गरज आहे. तरच शहराला किमान पिण्यासाठी पाणी मिळू शकते.
मंगळवार दुपारी 4 वाजता पाटबंधारे विभागाचे अधिकारी अचानकपणे मजरेवडी उपसा केंद्रावर दाखल झाले आणि मोटरपंप बंद करुन पॅनलबोर्ड सील केले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे अधिकार्यांची धावाधाव सुरु झाली. मात्र याचा काहीही उपयोग झाला नाही. यानिमित्ताने या योजनेवर असलेल्या संकटांच्या मालिकेत पाटबंधारे विभागाची भर पडली.
इचलकरंजी शहराला पंचगंगा व कृष्णा या दोन योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु पंचगंगा योजना बेभरवशाची असल्याने एका कृष्णा योजनेवरच शहराला जेमतेम पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या काही भागात पाच तर काही भागात आठ दिवसांनी नळाला पाणी येते.
तरीही अडचण समजून नागरिक मुकाट्याने सर्व काही सहन करत आहेत. आर्थिक वर्षाअखेर सुरु असल्याने टार्गेट पूर्ण करण्यासाठी सर्वच विभागात वसुलीचा तगादा आहे. याचा सर्वाधिक त्रास इचलकरंजी पाणी योजनेला होत आहे.
शहराची पाण्याची गरज ओळखून महावितरण, ठेकेदार, पाटबंधारे विभाग कृष्णा योजना बंद करुन पालिकेला खिंडीत पकडत आहे. विविध वर्गाकडून सातत्याने होत असलेल्या कारवायांमुळे पाणी पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारीही त्रस्त झाले आहेत. एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावा, किमान पाणी योजनांच्या मागील कटकट दूर करा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.