

मुंबई : जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यात तीन उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सुमारे 5 हजार 200 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षमतेत वाढ करण्यासाठी हा करार महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास मंत्री गिरीश महाजन, आमदार विनय कोरे, नवशक्ती निर्माण संस्थेचे अध्यक्ष नामदेव एच. पाटील उपस्थित होते. तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्थेच्या वतीने कुंभी ऑफ स्ट्रीम क्लोज्ड लूप उदंचन प्रकल्प, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग येथे दोन व शाहूवाडी येथे कडवी ऑफ स्ट्रीम क्लोज्ड लूप उदंचन प्रकल्प हा एक असे तीन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या माध्यमातून सुमारे 5 हजार 199 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 1100 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता स्थापित होणार आहे. या तीनही प्रकल्पांतून 1100 मनुष्यबळ रोजगार निर्मिती होणार आहे.
पावसाळ्यात समुद्रात जाणारे पाणी वळवून दुष्काळग्रस्त भागांना मदत करण्यासारखे अप्रत्यक्ष फायदेही यामुळे साध्य होऊ शकतात. सहकारातील हा पहिला प्रकल्प अधिक वेगाने पूर्ण होईल, असेही कोरे म्हणाले.
वारणा समूहाची उत्तम कामगिरी
वारणा समूहाने विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी केली असून, ऊर्जा क्षेत्रातही ते महत्त्वाची भूमिका बजावतील. या प्रकल्पांना ‘अँकर प्रोजेक्ट’ म्हणून सहकार्य देण्याचा राज्य सरकारचा विचार असून, वीज खरेदी करार (पीपीए) तसेच वित्तीय सहाय्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
असा आहे सामंजस्य करार
1. कुंभी ऑफ स्ट्रीम क्लोज्ड लूप (भाग अ)
स्थापित क्षमता (मे.वॅ) : 600
गुंतवणूक (रु. कोटी) : 2784
रोजगार निर्मिती : 600
2. कुंभी ऑफ स्ट्रीम क्लोज्ड लूप (भाग ब)
स्थापित क्षमता (मे.वॅ) : 300
गुंतवणूक (रु. कोटी) : 1434
रोजगार निर्मिती : 300
3. कडवी ऑफ स्ट्रीम क्लोज्ड
स्थापित क्षमता (मे.वॅ) : 200
गुंतवणूक (रु. कोटी) : 981
रोजगार निर्मिती : 200