

chhatrapati shivaji maharaj news book
सागर यादव
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज मुघल बादशहा औरंगजेबच्या आर्ग्यातील कैदेतून नेमके कसे सुटले ? , शंभूराजेंना सोबत घेऊनच ते महाराष्ट्रात परतले का ?, या प्रकरणानंतर मिर्झाराजा जयसिंग यांचा खून झाला की त्यांनी आत्महत्या केली ? यासह शिवछत्रपतींच्या भोसले कुळीचा राजपूतांशी संबंध होता का? शिवछत्रपतींचा मृत्यू कसा झाला? त्यांचे राज्य महाराष्ट्रापुरते मर्यादित होते का? शिवछत्रपतींच्या सैन्यात मुस्लिम होते का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारे शिवचरित्र लवकरच इतिहासप्रेमींपर्यंत पोहोचणार आहे.
इतिहास संशोधक प्रा. डॉ. रमेश जाधव यांनी गेली सुमारे 15 ते 20 वर्षे अभ्यास करून युगप्रर्वतक छत्रपती शिवराय या शिवचरित्राची निमिर्र्ती केली आहे. तब्बल 1200 पानांचे हे शिवचरित्राचे खंड 1 व खंड 2 अशा स्वरुपात मे महिन्यापर्यंत लोकार्पण करण्यात येणार आहे. इसवी सन 1907 अर्जुन कृष्णाजी केळुसकर यांच्या शिवचरित्रानंतर डॉ. जाधव यांचे हे शिवचरित्र अभ्यासक, संशोधक व इतिहासप्रेमींना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शिवचरित्रात विविध पैलूंवर प्रकाशझोत
डॉ. रमेश जाधव लिखित या शिवचरित्रातून विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. आजपर्यंतच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या संशोधनातून दिला आहे. आग्रा येथून शिवछत्रपती पेटार्यातून नाहीत तर वेशांतर करून बाहेर पडले होते. तेथून ते शंभूराजेंसोबत महाराष्ट्रात आले नाहीत, तर दोघांनी वेगवेगळा प्रवास केला. शिवछत्रपतींचा उत्तर भारतातील रजपुतांशी भोसले कुळीचा संबंध नव्हता, तर ते मराठा मातीतील भूमिपुत्र होते, या विषयावर सुमारे 90 पानांचे प्रकरण त्यांनी लिहिले आहे. शिवछत्रपतींची जन्म तारीख 8 एप्रिल 1627 रोजी असल्याचे संदर्भ त्यांनी मांडले आहेत. शिवरायांचा मृत्यूबाबतही या ग्रंथात महत्त्वपूर्ण लिखाण आहे.
शिवछत्रपतींनी निर्माण केलेले रयतेचे स्वराज्य महाराष्ट्रापर्यंत मर्यादित नव्हते, तर ते व्यापक होते. स्वराज्यात जाती-धर्म भेदाला थारा नव्हता. मुस्लिम सैनिक अंगरक्षका सारख्या महत्त्वपूर्ण पदावर होते. अनेक मस्जिदना त्यांनी देणग्या दिल्याचे संदर्भ त्यांनी दिले आहेत.
संशोधक-अभ्यासकांचे मोलाचे सहकार्य
शिवचरित्रासाठी भारत इतिहास संशोधन मंडळ, इंग्लिश रेकॉर्डस् ऑन शिवाजी, राजस्थान व महाराष्ट्रातील विविध पुराभिलेखागार, महाराष्ट्र ग्रंथ भांडार यासह विविध इतिहास संशोधन मंडळे व संस्था यांच्यासह प्रा. आनंद वैराट, रा. चि. ढेरे, रा. आ. कदम, प्रा. शशिकांत कुलकर्णी, दुर्गमहर्षी प्रमोद मांडे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, दुर्ग अभ्यासक भगवान चिले यांच्यासह विविध वृत्तपत्रे यांचे मालाचे सहकार्य झाल्याची माहिती डॉ. जाधव यांनी दिली.