

टोप : हातकणंगले तालुक्यातील टोप येथे राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे रखडलेले काम नागरिकांसाठी गंभीर डोकेदुखी ठरत आहे. परिसरात अपघातांची मालिका आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी टोप येथे महिलेला आपला जीव गमवावा लागला, तर पती गंभीर जखमी झाला.
पेठवडगाव फाटा ते बिरदेव मंदिरदरम्यान सहा पदरीकरणांतर्गत प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम गेल्या वर्षभराहून अधिक काळ संथ गतीने सुरू आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे कासारवाडी फाटा व टोप ग्रामपंचायत समोरील परिसरात दिवसातील बहुतांश वेळ वाहतूक कोंडी होत आहे. कासारवाडी फाट्यावर एकेरी रस्ता आणि तिहेरी वाहतूक अशी स्थिती निर्माण झाल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
रस्ता ओलांडताना पादचार्यांनाही जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागत आहे. टोप गावाची वस्ती महामार्गाच्या दोन्ही बाजूंना असल्याने ग्रामस्थांना गावात प्रवेश व बाहेर पडताना मोठा धोका पत्करावा लागत आहे. रोजच लहान-मोठे अपघात घडत असून प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. हे काम नेमके कधी पूर्ण होणार, असा सवाल स्थानिकांसह पंचक्रोशीतील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आणखी किती बळी जाणार?
14 फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातात रेठरे बुद्रुक येथील तरुणीचा मृत्यू झाला. व्हॅलेंटाईन दिनीच पतीसमोर पत्नीचा झालेला मृत्यू हृदयद्रावक ठरला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महामार्गाचे रखडलेले काम आणखी किती बळी घेणार, असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.