

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बुधवारी मुंबईतील विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षस्थतेखाली उच्चाधिकार समितीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीकडे संपूर्ण सीमावासीयांच्या नजरा लागल्या आहेत.
आगामी काळात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्यामुळे बुधवारी होणाऱ्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, खासदार शरद पवार, नारायण राणे, दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, तज्ज्ञ समिती अध्यक्ष खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार जयंत पाटील, समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील, शंभुराज देसाई यांच्यासह सत्ताधारी, विरोधी गट, तज्ज्ञ आणि मध्यवर्ती समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मध्यवर्ती समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर, ॲड. महेश बिर्जे मुंबईला रवाना झाले आहेत. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती सातत्याने सरकारकडे उच्चाधिकार समितीची बैठक व्हावी, यासाठी पाठपुरावा करत आली आहे. त्यानुसार सुरुवातीला ३० जून रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते; पण प्रशासकीय कारणांमुळे ही बैठक लांबणीवर पडली होती. आता बैठकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून बुधवारी विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात दुपारी १.३० वाजता ही बैठक होणार आहे.
l सीमाप्रश्नाची सुनावणी लवकर व्हावी
l साक्षीदारांची प्रतिज्ञापत्रे निश्चित करावीत
l सीमाभागातील कानडीकरण थांबवावे.
l सुनावणीवेळी महाराष्ट्राचे अधिकारी व सीमा समन्वय मंत्री उपस्थित राहावेत
l कोल्हापूर जिल्हाधिकारी व पोलिसप्रमुखांवर कारवाई करावी.