कोल्हापूर : कोल्हापुरात सूर्य आग ओकू लागला आहे. रविवारी यंदाच्या मौसमातील सर्वोच्च 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उन्हाचा तडाखा इतका जास्त होता की, दुपारच्या वेळी काही ठिकाणी रस्त्यांवरील डांबर वितळल्याचे पाहायला मिळाले, तर घराबाहेर पडल्यानंतर उन्हाच्या तीव— झळा जाणवत होत्या.
यामुळे नेहमी गजबजलेल्या मुख्य रस्त्यांवर वर्दळ कमी पाहायला मिळाली. दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्याला सोमवारी (दि. 13) उष्णतेच्या लाटेचा व दमट वातावरणाचा यलो अलर्ट दिला आहे. यामुळे उकाडा कायम राहणार, हे निश्चित आहे. वाढत्या तापमानासोबतच किमान तापमानातही वाढ होऊन ते 23.6 अंशांवर पोहोचले आहे. परिणामी, सायंकाळनंतरही कोल्हापूरकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक छत्री, टोपी, स्कार्फ आणि सनकोटचा वापर करत आहेत. घराघरांत फॅन, कुलर आणि एसीचा वापर वाढला असून, दुपारच्या वेळी शीतपेये, फळांचे रस आणि आईस्क्रीमच्या गाड्यांवर तहान भागवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान विभागाने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट दिला आहे.