

कोल्हापूर : जिल्ह्यात २००२ च्या मतदारयादीशी मॅपिंग न झालेल्या १ लाख १५ हजार ९४६ आणि विसंगती आढळलेल्या १ लाख १२ हजार ५२३ अशा एकूण २ लाख २८ हजार ४६९ मतदारांच्या दि.२८ सप्टेंबरपासून सुनावण्या होणार आहेत. या सुनावणीत पुरावे म्हणून सादर केलेल्या कागदपत्रांनंतरच, त्यांचे नाव अंतिम मतदारयादीत राहणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे.
मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमातर्गंत जिल्ह्यातील ३३ लाख ५५ हजार २४४ एकूण मतदारांची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीनंतर ४ लाख ४९ हजार २५७ मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली. पडताळणी दरम्यान १ लाख १५ हजार ९४६ मतदारांचे मॅपिंग झाले नाही तर १ लाख १२ हजार ५२३ मतदारांच्या बाबतीत विसंगती आढळून आली.
या मॅपिंग न झालेल्या आणि विसगंती आढळून आलेल्या मतदारांची आता सुनावणी घेतली जाणार आहे. या करिता १० मतदारसंघांत १११ सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यांच्या कार्यालयात या सुनावण्या होणार आहेत. काही ठिकाणी मतदान केंद्रस्तरावरही हे अधिकारी सुनावणी घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सुनावणीसाठी संबंधित मतदारांच्या नोटिसा तयार करण्याच्या प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून बुधवारी (दि.१६) सुरू झाल्या.
या नोटिसा मतदारांना बीएलओ यांच्यामार्फत बजावल्या जाणार आहेत. नोटीस काढल्यानंतर सात दिवसांचा कालावधी देणे बंधनकारक आहे. मात्र, सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने मतदारांना अडचण निर्माण होऊ नये याकरिता सोमवार दि.२८ सप्टेंबरपासून सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित मतदारांना सुनावणीचे ठिकाण, तारीख आणि वेळ नोंद असलेल्या नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सुनावणीनंतर अंतिम मतदारयादीत नाव होणार कायम
या सुनावणीत मतदारांनी पुरावे म्हणून सादर केलेली कागदपत्रांची पडताळणी होईल. त्यानंतरच संबंधित मतदाराच्या नावाचा अंतिम मतदारयादीत समावेश करायचा की नाही, याचा निर्णय संबंधित मतदार नोंदणी अधिकारी घेणार आहेत.
सुनावणीस गैरहजर राहिल्यास नाव वगळणार
नोटीस दिल्यानंतरही सुनावणीस मतदार गैरहजर राहिल्यास त्याला पुन्हा दोन वेळा नोटीस दिली जाणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या नोटिसीत विचारून, सोयीची वेळ, तारीख दिली जाईल. यानंतरही मतदार सुनावणीला आला नाही तर त्याचे नाव मतदारयादीतून रद्द केले जाणार आहे.