

कोल्हापूर : विशेष चौकशीमधील ४२७ दूध संस्थांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जय जवान जय किसान (खेबवडे), कौलव महिला, कै. दिनकरराव कवडे (आवळी बु.), सुरभी (मौजे वडगाव) या चार दूध संस्थांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी (दि. ८) सुनावणी होत आहे.
गोकुळ संलग्न ४२७ दूध संस्थांच्या सभासद नोंदणीवर आक्षेप घेत तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी सहकार विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी संस्थांच्या विशेष चौकशीसाठी द्विसदस्यीय समितीची नेमणूक केली होती. या संस्थांचा पात्र-अपात्रतेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला. याचिका दाखल झाल्यानंतर यापैकी २७० संस्था पात्र ठरविण्यात आल्या. तर उर्वरित संस्था या अवसायन यादीत आहेत.
अवसायन प्रक्रियेतील दूध संस्थांची सुनावणी पूर्ण करून पात्र-अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार सहायक निबंधक दुग्ध यांच्याकडे दिला आहे. सुनावणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोल्हापूर सर्किट बेंचने ८० दिवसांची मुदत दिली आहे. त्यानुसार सुनावणीची प्रक्रिया सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ४२७ दूध संस्थांच्या याचिकेबाबत कोल्हापूर सर्किट बेंच काय निर्णय घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.