

Hasan Mushrif On NCP Merger Politics: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) मोठी पोकळी निर्माण झाली असून, पक्षातील अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या 'विलिनीकरणाच्या' इच्छेबाबत १२ तारखेला गौप्यस्फोट करण्याची घोषणा केली आहे. यावर हसन मुश्रीफ यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली असून विरोधकांच्या 'लुडबुडी'वर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
अजितदादांच्या निधनाचा धक्का इतका मोठा होता की, जणू राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर 'ऑटोबॉम्ब' पडला आहे. सगळेजण शून्य झाले होते, अशा परिस्थितीत राजकारण सुचण्यासारखी स्थिती नव्हती, असे मुश्रीफ म्हणाले.
रोहित पवार ज्या १२ तारखेच्या गौप्यस्फोटाबद्दल बोलत आहेत, त्याबाबत मुश्रीफांनी सांगितले की, "त्यांची भूमिका काय आहे आम्हाला माहिती नाही. पण विलिनीकरणाच्या चर्चेत अजितदादा होते, आम्ही कोणी प्रमुख माणसं नव्हती, असा आमचा दावा आहे."
"अजितदादांचे घराणे पुरोगामी आहे, तिथे विधी लवकर आटोपले जातात. चौथ्या दिवशी सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली कारण कुटुंबाची तशी इच्छा होती. दादांच्या अचानक जाण्याने पक्षाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पार पाडली, यात चुकीचे काय?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादीच्या अंतर्गत विषयात संजय राऊत यांनी लुडबूड करू नये. आम्ही दुःखात असताना ही मंडळी का डिवचत आहेत, अशी शंका मुश्रीफांनी व्यक्त केली. मात्र, शरद पवारांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याच्या राऊतांच्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले.
हा केवळ एक दुर्दैवी अपघात आहे. ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे चित्र स्पष्ट होईल. मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारने आधीच चौकशी लावली आहे, त्यामुळे यावर राजकारण होऊ नये, असे आवाहन मुश्रीफांनी केले.