मुंबई : पुढारी वृत्तसेवा
भाजपमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत समरजितसिंह घाटगे यांनी हाती तुतारी घेतल्यानंतर कागलचे राजकारण तापू लागले आहे. देवेंद्र फडणवीस यांचा काहीजणांनी विश्वासघात केला,
असा आरोप करत राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घाटगे यांच्यावर मंगळवारी निशाणा साधला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या परवानगीनेच मी अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असा दावाही मुश्रीफांनी केला. मुश्रीफ म्हणाले, फडणवीस यांच्याकडून फायदा मिळविणारेच आता त्यांचा विश्वासघात करताना दिसत आहेत,
अशी टीका मुश्रीफ यांनी घाटगे यांचे नाव न घेता केली. ते म्हणाले, कागलच्या जनतेने मला सहा वेळा आमदार केले आहे, म्हणून काहीजण हवा बदलली आहे, असे म्हणत आहेत. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अशीच हवा बघत राहिलात तर तुमचे वाटोळे होईल, असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला.