

गुडाळ : राधानगरी तालुक्यातील गुडाळ गावात मंगळवारी पहाटे चोरट्यांनी दोन तास धुमाकूळ घालत सात बंद घरे लक्ष्य केली. मुख्य रस्त्यावरील आणि गल्लीतील बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून चोरट्यांनी घरफोडी केली. यामध्ये प्रकाश माळवी यांच्या घरातून 15 हजार रुपयांची रोकड आणि चांदीचे दागिने लंपास केले असून, इतर सहा घरांत चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
एकाच रात्री सात घरांवर डल्ला
गुडाळ-खिंडी व्हरवडे मुख्य रस्त्यावरील आशिष पाटील, प्रकाश पाटील, अभिजित चौगले, साताप्पा पाटील, संभाजी पाटील यांची पाच बंद घरे चोरट्यांनी फोडली. याशिवाय माळवी गल्लीतील प्रकाश माळवी आणि पोलीस कर्मचारी विजय माने यांचेही घर फोडण्यात आले. बहुतेक कुटुंबे नोकरी किंवा वैयक्तिक कारणास्तव मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे वास्तव्यास असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. विजय माने यांचे घर फोडताना चोरट्यांनी शेजारच्या घरांच्या कड्या बाहेरून लावून घेतल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून संशयितांचा शोध सुरू आहे. रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
रोख रक्कम, दुचाकी लंपास
प्रकाश माळवी यांच्या घरातून चांदीच्या मूर्ती, दागिने, रेसर सायकल आणि 15 हजार रुपये चोरीला गेले आहेत. ठाणटेक परिसरातील अमोल माळवी यांची दुचाकीही लांबवली. सायंकाळी दोन तरुण इलेक्ट्रिक दुचाकीवरून टेहळणी (रेकी) करताना आढळले होते, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.