

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीसाठी दूध संस्थांकडून पाठविले जाणारे ठराव व्यक्तिगत स्वीकारले जाणार आहेत. एकगठ्ठा ठराव न स्वीकारले जाणार नसल्याची माहिती सहायक निबंधक (दुग्ध) कृष्णा ठाकरे यांनी दिली. तसेच संबंधित दूध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, सभासद यांच्याकडून ठराव देण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. दूध संस्थांकडून ठरावाची प्रत सहायक निबंधक कार्यालयाकडे सादर करण्यास सुरुवात झाली आहे. गोकुळमधील सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूने एकगठ्ठा ठराव न स्वीकारण्याची मागणी केली आहे. त्यानुसार सहायक निबंधक यांनी एकगठ्ठा ठराव न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी आजी-माजी संचालक, नेत्यांचे प्रमुख कार्यकर्ते दूध संस्थांचे ठराव आपल्या ताब्यात घेऊन ते सहायक निबंधक कार्यालयाकडे सादर करायचे. यंदा मात्र आता तसे होणार नाही. दूध संस्थांना संस्थेच्या अधिकृत व्यक्तीकडूनच ठराव पाठवावा लागणार आहे. ठराव सादर करताना संबंधितास ओळखीचा पुरावाही द्यावा लागणार आहे.
गुरुवारी १७ ठराव दाखल
सहायक निबंधक कार्यालयाकडे गुरुवारी १७ दूध संस्थांनी ठराव दाखल केले. आजअखेर एकूण २८ संस्थांकडून ठराव दाखल झाले आहेत. सोमवारनंतर ठराव दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
शनिवारी उभारणार मंडप, तालुकानिहाय स्वीकारणार ठराव सोमवारनंतर ठराव सादर करण्यासाठी दूध संस्था प्रतिनिधींची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सहायक निबंधक कार्यालयाबाहेर शनिवारी मंडप उभारला जाणार आहे. येथे तालुकानिहाय ठराव स्वीकारण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
अनेक दूध संस्थांमध्ये दोन गट पडल्याने दुबार ठराव वाढणार
कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीसाठी ठराव पाठविताना अनेक दूध संस्थांमध्ये दोन गट पडल्याचे निदर्शनास येत आहेत. संचालक मंडळात पडलेल्या दुफळीमुळे दूध संस्थांमधील राजकारण तापले आहे. एकमत होत नसल्याने सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे दोन्ही गटाकडून ठराव दाखल केले जात आहेत. यावरुन पुढील काळात घमासान होण्याची शक्यता आहे. दुबार ठरावांवरील हरकत व सुनावणीमुळे ‘गोकुळ’साठी ठरावधारक मतदारांची प्रारुप यादी तयार करताना विलंब होण्याचाही धोका निर्माण झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळची निवडणुक प्रक्रीया सुरु झाली आहे. सहाय्यक निबंधक कार्यालयाकडुन दूध संस्थांना ठराव मागणीचा मसूदा पाठविला आहे. आता दूध संस्थाकडून ठराव सादर करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. जिल्ह्यातील राजकारण्यांकडून आतापासूनच ठरावासाठी साम, दाम, दंड व भेद नितीचा वापर सुरु झाला आहे. यामुळे ठरावधारकांना अधिक महत्व प्राप्त झाले आहे. ठराव आपल्या कार्यकर्त्यांच्या नावे व्हावा. यासाठी काही इच्छुक मंडळीकडून पडद्यामागच्या हालचाली सुरू आहेत. संचालक मंडळांतर्गत ठराव आपल्याच नावे होण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यामधून संचालक मंडळात दूफळी निर्माण झाली आहे.
सहाय्यक निबंधक दुग्ध कार्यालयाकडून पाठवलेल्या ठराव मसूदा पत्रावर अधिकृत क्रमांक असणे आवश्यक होते. मात्र तसे काही नसल्यामुळे संस्थापातळीवर यासारखी एकापेक्षा अधिक पत्रे तयार करता येणार आहेत. संचालक मंडळाने बहुमताने ठराव केला तरी दुसऱ्या गटाकडूनही ठराव दाखल होणार आहे. अनेक दूध संस्थांकडून असे दुबार ठराव दाखल होण्याची शक्यता आहे.