

कोल्हापूर : गड्या हे कोल्हापूर हायं... इथला प्रत्येक विषय हार्डच असतोय... गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने करवीर तालुक्यातील शेळकेवाडीमधील एक विषय चर्चेत आला आहे. गावातील ज्योतिर्लिंग दूध संस्थेने ठरावाचा लिलावच केला. स्व. आ. पी. एन. पाटील गटाच्या संचालक भारती शेळके यांनी तब्बल ३ लाख ७५ हजार रुपयांची बोली लावत ठराव आपल्या ताब्यात घेतला. ठरावाची रक्कम संस्थेच्या दूध उत्पादक सभासदांमध्ये वितरित करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
गोकुळची निवडणुक प्रक्रिया सुरू आहे. ठरावासाठी महायुतीमध्येच अंतर्गत चढाओढ आहे. त्यामुळे दूध संस्थांचे ठराव लाखमोलाचे झाले आहेत. नेते, त्यांचे प्रमुख कार्यकर्ते ठरावासाठी लाखाचं दाम मोजत आहेत. यामधून इर्ष्या निर्माण झाली आहे. या प्रकारातून ग्रामीण भागातील राजकारण मात्र चांगलेच तापले आहे.
शेळकेवाडीतील ज्योतिर्लिंग दूध संस्थेच्या तरुण सभासदांनी, कार्यकर्त्यांनी ठरावाचा लिलाव करण्यासाठी पुढाकार घेतला. यंदा ठरावाचे दाम संस्थेच्या सभासदांनाही मिळाले पाहिजे, यासाठी तरुण आग्रही होते. यामधून ठरावाचा लिलाव करण्याचे ठरले. मग, आ. चंद्रदीप नरके आणि स्व. आ. पी. एन. पाटील गटात ठरावासाठी २ लाख रुपयांपासून बोलीला सुरुवात झाली. नरके गटाच्या कार्यकर्त्यांनी ३ लाखांची बोली केली. पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी ३ लाख ७५ हजारांची बोली लावत बाजी मारली.