

कोल्हापूर : महायुतीच्या टेबलवर कोणत्या घटक पक्षाच्या ठरावाचे वजन राहणार, याचा अंदाज लवकरच येईल. ठरावाच्या संख्येवर जागा वाटपाचे सूत्र ठरणार असल्याने सध्या तरी प्रत्येक घटक पक्षाने दोन हजार ठराव गोळा करण्याचे टार्गेट ठेवले आहे. त्यानुसार ठराव गोळा करण्यासाठी आता भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेतच रस्सीखेच सुरू आहे. जास्तीत जास्त ठराव आपल्या पक्षाकडे कसे येतील यासाठी नेते, आजी-माजी संचालक, पदाधिकारी यांच्याकडून व्यूहरचना आखली जात आहे.
भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच टेबलावर असणार्या ठरावांच्या संख्येवर महायुतीचे जागा वाटपाचे सूत्र ठरणार असल्याचे जाहीर केले आहे. घटक पक्षांकडून यंत्रणा गतिमान झाली आहे. १ जुलैपर्यंत ठराव दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
संस्था ५४७०, टार्गेट ७ हजार
गोकुळने ५४७० संस्था यादी सादर केली आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि जनसुराज्यचे टार्गेट पाहता ते ७ हजारच्या घरात जाते. सध्याच्या आकडेवारीनुसार संस्था ५४७० असून यामधून आमदार सतेज पाटील यांची राजर्षी शाहू समविचारी आघाडीही लक्षणीय ठराव गोळा करेल. महायुतीचे एकत्रित टार्गेट ७ हजार आहे. टार्गेटच्या तुलनेत कोणत्या पक्षाच्या हाती किती ठराव लागणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.