

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील महायुतीच्या भावकीमधील काहीसा शांत झालेला वाद ठरावाच्या संख्येवरून पुन्हा उफळण्याची शक्यता आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी (दि. २५) शक्तिप्रदर्शन करत मोठा भाऊ म्हणून राष्ट्रवादीची घोषणा केल्याने अन्य घटक पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. काहींनी तर सोशल मीडियावरून घोषणेतील ठराव आणि प्रत्यक्षातील ठराव याचे गणितच मांडले. यावरून महायुतीमधील घटक पक्षांमध्ये ठरावाच्या संख्येवरून इर्ष्या रनिर्माण झाल्याचे निदर्शनास येते. सोमवारी भाजप, शिवसेना शिंदे गट किती ठराव दाखल करणार, याकडेही संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.
महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला हा ठरावांच्या संख्येवर ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक घटक पक्ष आपल्याकडेच कसे जास्त ठराव येतील, यासाठी प्रयत्नशील आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी शक्तिप्रदर्शन करत आपल्याकडे १,९६८ ठराव असल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याकडे किती ठराव आहेत, याची यादीच जाहीर केली. त्यामुळे आता ठरावांच्या संख्येवरून महायुतीमध्ये वर्चस्ववाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सांगितले १ हजार ९६८; दाखल झाले १ हजार ६५८
मंत्री हसन मुश्रीफ यांनी मेळाव्यात १,९६८ ठराव असल्याचे सांगितले; मात्र सहायक निबंधक कार्यालयात प्रत्यक्षात १,६५८ ठराव दाखल झाले. त्यामुळे ठरावाच्या संख्येवरून शंका निर्माण झाली; पण उर्वरित ठराव हे यापूर्वी दाखल झाले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादीकडे नेमके किती ठराव आहेत, याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
निम्मे ठराव राष्ट्रवादीचे, अन्य पक्षांकडे किती?
गोकुळसाठी सध्या ४,८४४ संस्था सभासद आहेत. यापैकी जवळपास निम्मे ठराव हे राष्ट्रवादीकडे असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीवरून सिद्ध होते. मग, भाजप, शिवसेना, काँग्रेस, जनसुराज्य या पक्षांकडे नेमके किती ठराव आहेत, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनेकडून १५००, तर भाजपकडून १२०० दूध संस्थांचे ठराव आपल्याकडे असल्याचा दावा केला जात आहे.