

कोल्हापूर : गोकुळ दूध संघातील वर्चस्ववादातून महायुतीमध्ये निर्माण झालेला वाद आता मुंबईपर्यंत पोहोचला आहे. गोकुळचे नेते, संचालक सोमवारी मुंबईला रवाना होणार असून मंगळवारी सकाळी ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतील. त्यांच्यासमवेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहेत. महायुती म्हणून निवडणूक लढणे, प्रशासक नियुक्तीबाबत यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
स्थानिकांना विचारात घेऊनच निर्णय
मुंबईत होणार्या चर्चेनंतर मुख्यमंत्री कोल्हापूरमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबतही चर्चा करतील. त्यांना विचारात घेऊनच पुढील पावले उचलली जातील, असे एका भाजप नेत्याने सांगितले. सध्या शांत राहण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून आल्याचे समजते. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादीमधील वाद मुख्यमंत्र्यांसमोर मिटेल, अशी अपेक्षा आहे.
उद्याच्या सुनावणीकडे लक्ष
सत्ताधार्यांकडून निवडणूक प्रक्रिया लवकर सुरू कशी होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र आमदार शिवाजी पाटील, प्रकाश बेलवाडे यांनी केलेल्या तक्रारींमुळे निवडणूक न्यायालयीन कचाट्यात सापडली आहे. त्यामुळे सोमवारी (दि. 27) आणि मंगळवारी (दि. 28) कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये होणार्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.