

गुडाळ : पुढारी वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यातील कुडूत्री येथील बावशेत नावाच्या शेतात २ वर्षांच्या मादी जातीच्या पिलाचा मृतदेह आज (दि.७) दुपारी ग्रामस्थांना आढळून आला. गव्याच्या पिल्लाचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. (Radhanagari Gaur)
याबाबत अधिक माहिती अशी की, खिंडी व्हरवडे ते मांजरखिंड या राज्यमार्गाच्या वरील बाजूस असलेल्या जंगलात गव्याच्या कळपांचे वास्तव्य आहे. घाटमार्गाच्या खालील बाजूस असलेल्या खिंडी व्हरवडे, गुडाळ, करंजफेण, कुडूत्री, सोन्याची शिरोली गावच्या शिवारात रात्री -अपरात्री गव्यांच्या कळपांचा वापर नित्याचाच झाला आहे. अशाच कळपातून आलेल्या व चुकलेल्या मादी जातीच्या पिलाचा मृतदेह कुडूत्री च्या शिवारात आढळून आला.
या बाबत ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनरक्षक महादेव अंगज व रेस्क्यू टीमने घटनास्थळी भेट दिली. ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत पिलाला शेतातून बाहेर काढले. गव्याच्या कळपाने बावशेत शिवारात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले. त्यामध्ये ऊस, मका, तीळ या पिकांचा समावेश आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वन विभागाच्या वतीने मृत पिलाचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्या मार्फत शवविच्छेदन करून जंगलामध्ये दहन करण्यात आले.