

कोल्हापूर : रिक्षासाठी वापरला जाणारा एलपीजीचा दर शंभर रुपये प्रतिकिलो झाला आहे. गॅस दरात दुप्पट वाढ झाल्याने रिक्षा व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. भरमसाट दरवाढीने व्यवसाय करायचा कसा? असा प्रश्न व्यावसायिकांसमोर आहे. सद्यस्थितीत शहरातील 30 टक्के रिक्षाचालकांनी रिक्षा दारात लावून व्यवसाय बंद ठेवला आहे. रिक्षाची चाके थांबल्याने संसाराचा गाडा चालवायचा कसा, या चिंतेत सध्या रिक्षा व्यावसायिक आहेत.
आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धामुळे शहरातील इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. विशेषत:, याचा फटका एलपीजी किट बसवलेल्या रिक्षाचालकांना बसत आहे. 43 रुपये प्रतिकिलो असलेला गॅसचा दर आज तब्बल शंभर रुपये झाला आहे. रिक्षा भाड्यात कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे व्यवसाय करणे मुश्कील बनले आहे.
4,500 रिक्षांसाठी दोनच गॅस पंप
शहरात एलपीजी किट बसवलेल्या सुमारे 4,500 रिक्षा आहेत. लिशा हॉटेल आणि कळंबा रोड या दोनच ठिकाणी एलपीजी पंप आहेत. या पंपांवर रिक्षाचालकांच्या रांगा लागतात. त्यामुळे गॅस भरण्यासाठीच दीड ते दोन तास जातात. गॅस दरवाढीसह गॅस भरण्यासाठी लागणार्या रांगांचेही संकट रिक्षा व्यावसायिकांसमोर आहे.