

कोल्हापूर : अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सलग तिसर्या दिवशीही तांत्रिक गोंधळ कायम राहिल्याने जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी, पालक त्रस्त झाले आहेत. संकेतस्थळ वारंवार बंद पडणे, अर्ज अर्धवट राहणे व लॉगिन न होणे अशा समस्यांमुळे प्रवेश प्रक्रियेचा फज्जा उडाला आहे.
जिल्ह्यातील 291 कनिष्ठ महाविद्यालये व 70 हजार 690 प्रवेश जागांसाठी अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. महाविद्यालय पसंतीक्रम भरण्याचा शेवटचा टप्पा सुरू आहे. परंतु राज्यात एकाचवेळी लाखो विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरत आहेत. सलग तिसर्या दिवशीही विद्यार्थ्यांना सर्व्हर डाऊनमुळे अडचणींचा सामना करावा लागला. विद्यार्थी नेट कॅफेवर हेलपाटे मारताना दिसले. ग्रामीण भागातील अनेक पालक, विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेचे पुरेसे ज्ञान नसल्याने ते महाविद्यालये व नेट कॅफेत रांगा लावून होते. नवीन नोंदणी, अर्जातील दुरुस्ती, महाविद्यालयाचा पसंतीक्रम भरणे ही कामे ठप्प झाली आहे. प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे पालकांमधून तीव— संताप व्यक्त केला जात आहे.