

कोल्हापूर : दरवर्षी 15 फेब्रुवारी ते 15 जून हा कालावधी आगीच्या हंगामाचा कालावधी म्हणून ओळखला जातो. या कालावधीमध्ये वनक्षेत्रात आगी लागून वनसंपत्तीचे तसेच जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. महाराष्ट्रात सर्व वन विभागामध्ये यावर उपाययोजना म्हणून 1 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत वनवणवा सप्ताहाचे आयोजन केले जाते. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हा सप्ताह होणार आहे.
वनवणवा सप्ताहअंतर्गत वनक्षेत्रामधील गावागावांत प्रामुख्याने संवेदनशिल क्षेत्रात, गावात सभा आयोजित करून आगीच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करणे, वनसंरक्षणासाठी लोकांचे प्रबोधन करणे, आगीमुळे पर्यावरणावर होणारे विपरित परिणाम व शासन संपत्तीचे नुकसान टाळण्यासाठी सहकार्य मिळविण्याच्या द़ृष्टिकोनातून जनतेमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करणे, जाहिरात, फलक, ऑडियो व व्हिडीओ दाखवून जनजागृती केली जाते.
वनवणवा प्रतिबंधात्मक उपाययोजना अशी...
वनक्षेत्रास आगी लागू नयेत म्हणून आंतरराज्य सीमेवरील वनहद्दीवर 12 मीटर, जिल्हासीमेवरील वनहद्दीवरील 6 मीटर, कुपाअंतर्गत त्याचबरोबर वनक्षेत्र व मालकी क्षेत्राच्या हद्दीवर व वनहद्दीतील रस्त्यालगत 3 मीटर रुंदीच्या पट्ट्यातील झुडपे व गवत साफ करून त्याठिकाणी जाळरेषा घेतली जाते.
वन कर्मचारी यांना वनसंरक्षण व संवर्धन कामात कायम सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच, ग्रामपंचायत व सार्वजनिक ठिकाणी वनांचे महत्त्व व जंगल आग परिणाम याविषयी आग प्रतिबंधक पंधरवडा व सप्ताहअंतर्गत विविध माध्यमांतून जनजागृती केली जाते.
प्रत्येक नियतक्षेत्रासाठी फायर वॉचर नेमून आगीच्या घटना घडू नये म्हणून दक्षता घेतली जात आहे.
आग लागलेचे निदर्शनास आलेस वन कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या मदतीने तत्काळ आगीवर नियंत्रण ठेवून आग विझवली जाते.
वन विभागातर्फे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. या नियंत्रण कक्षामध्ये (फायर सेल) वन कर्मचारी 24 तास कार्यरत आहेत. तसेच, फॉरेस्ट हेल्पलाईन क्रमांक 1926 हा टोल फ्री क्रमांक जाहीर केलेला असून, अवैध घटना व वनवणव्याबाबत तत्काळ माहिती सदर क्रमांकावरून वन विभागास कळवावी, असे आवाहन उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी केले आहे.