

उत्तूर : आजरा तालुक्यातील चिमणे येथे सेवानिवृत्त शिक्षकाच्या निरोप समारंभादरम्यान भोजनातून सुमारे ७० हून अधिक जणांना विषबाधा झाली. बाधितांवर तातडीने उपचार करण्यात आले आहेत.
* मुलांसह महिला, पुरुष आणि वृद्धांचा समावेश
* प्रशासनाकडून विषबाधा कारणाचा शोध सुरू
शुक्रवारी सायंकाळी भोजन घेतल्यानंतर अनेकांना मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि अस्वस्थता जाणवू लागली. काहींची प्रकृती बिघडल्याने त्यांना चिमणे आरोग्य उपकेंद्रात दाखल केलेे. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अनेक रुग्णांना उत्तूर आरोग्य केंद्रात हलविले. काही गंभीर रुग्णांना पुढील उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यामध्ये मुलांसह महिला, पुरुष आणि वृद्धांचा समावेश आहे. जि.प. सदस्य शिरीष देसाई, पं.स. सदस्य विकास चोथे यांनी उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
डॉ. सौरभ कसबे यांनी सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात असून बहुतांश रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. प्रशासनाकडून अन्नातून विषबाधा होण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.