

कोल्हापूर : बदलती जीवनशैली, आहारातील बदल, धावपळीचे जीवन यामुळे महिलांमध्ये गर्भावस्थेत गुंतागुंत निर्माण होण्याची भीती असते. गेल्या दहा वर्षांपासून महिलांना गर्भावस्थेतील हायपर टेन्शन ही सतावणारी समस्या पुढे येत आहे. सुमारे पाच टक्के गर्भवती महिलांमध्ये उच्च रक्तदाब आढळत आहे. त्यातूनच प्री-एक्लमप्शियाची (गरोदरपणातील अतिरक्तदाब ) शक्यता वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. तसेच 18 ते 50 वर्षे वयोगटातील नागरिक देखील उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत.
‘मातृत्वाचा काळ सुखाचा’ हीच भावना गर्भावस्थेत प्रत्येक महिलेच्या मनात असते. मात्र, या आनंदात अनेक प्रश्नांचे घर समस्यांचे कारण बनत आहे. बर्याचदा गर्भवती महिलांत रक्तदाब वाढणे, हात-पायांना सूज आणि मूत्रात प्रोटीन जमा होणे, बाळाची वाढ खुंटणे, बाळाचा गर्भात मृत्यू होणे अशा समस्या उद्भवू शकतात. यालाच वैद्यकीय भाषेत ‘प्री-एक्लमप्शिया’ असे म्हणतात. बदलत्या जीवनशैलीत 5 टक्के गर्भवती महिलांत समस्या आढळून येत आहे.
रक्तदाब वाढणे हे प्री-एक्लमप्शियाचे पहिले लक्षण असू शकते. त्यामुळे हायपर टेन्शनचे वेळेत निदान होणे गरजेचे आहे. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधे, वैद्यकीय चाचण्या, बाळाच्या हालचालींचे मोजमाप, सोनोग्राफी आणि डॉपलरच्या माध्यमातून माता आणि गर्भाशयातील बाळावर देखरेख ठेवणेही महत्त्वाचे आहे. यापैकी देखभालीच्या वैद्यकीय चाचणीतून मातेला किंवा बाळाला धोका असल्याचे निदान होत असल्यास प्रसूती करावी लागले. त्यामुळेच गर्भावस्थेत एक्लमप्शिया असलेल्या मातांची पूर्ण दिवस भरण्याआधीच ठरवून प्रसूती केली जाते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगभरात 30 ते 79 वयोगटातील 1.28 अब्ज नागरिक उच्च रक्तदाब आजारी आहेत. त्यापैकी जवळपास निम्म्या लोकांना त्याबद्दल माहिती नाही. अनेकांच्या शरीरावर त्यांचा कसला परिणाम दिसून येत नाही. आरोग्य संघटनेची यंदा 2025 च्या जागतिक उच्च रक्तदाब दिनाची थीम आहे. ‘तुमचा रक्तदाब अचूकपणे मोजा, तो नियंत्रित करा, दीर्घायुषी व्हा!’ अशी आहे. वर्ल्ड हायपरटेन्शन लीगने पहिल्यांदा सन 2005 मध्ये जागतिक उच्च रक्तदाब दिन सुरू केला.
बदललेले आहार, व्यवहार, विचार यामुळे रक्तदाबाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे शरीराचे सूत्र बिघडले आहे. गर्भवती महिलांमध्ये सुमारे पाच टक्क्याहून अधिक प्रमाण उच्च रक्तदाबाचे आहे. उच्च रक्तदाबामुळे शरीराच्या इतर अवयवांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे आपण आनंदी जीवन जगू शकत नाही. वयाच्या 20 व्या वर्षापासून किमान वर्षातून दोनवेळा रक्तदाब तपासणी करून घ्यावी.
डॉ. अर्जुन आडनाईक, हृदयरोगतज्ज्ञ