

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यात मत्स्य शेती साकारली जाईल. मत्स्य व्यवसायाला व्यावसायिक चालना आणि शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णतः बदलण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. तो जिल्ह्यात मत्स्यक्रांतीचे पाऊल ठरेल, असा विश्वास व्यक्त करत याद्वारे पाच हजारांवर कुटुंबांना रोजगार उपलब्ध होईल, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
‘फिश फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन’च्या (एफएफपीओ) माध्यमातून मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना, प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजना आणि जिल्हा नियोजन समिती यांच्या वतीने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण झाले.
आबिटकर म्हणाले, या उपक्रमामुळे तालुक्यात मत्स्य पालनासोबतच रोजगारनिर्मिती आणि निर्यातीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जिल्हा हा ऊस शेती आणि दुग्ध व्यवसायात अग््रेासर आहेच. आता मत्स्य शेती क्षेत्रातही जिल्ह्याला आघाडीवर नेण्याचा मानस आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी या प्रकल्पाचा कृती आराखडा जलद गतीने सादर करावा.
राधानगरी परिसरात ‘ॲक्वा एक्सपोर्ट हब’
प्रकल्पांतर्गत राधानगरी आणि आसपासच्या तालुक्याला ‘ॲक्वा एक्सपोर्ट हब’ म्हणून विकसित केले जाईल. त्याचे दूरगामी परिणाम दिसतील. मत्स्य प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि कोल्ड चेन क्षेत्रात 250 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आकर्षित करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील एफपीओ ला प्रोत्साहन देऊन महिला सक्षमीकरण आणि सीमांत शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधला जाईल.