

अनुराधा कदम
कोल्हापूर : आई आणि बाबा... तुम्ही भांडायचा, एकमेकांवर हात उगारायचा. ते भांडण वाढले आणि बाबा, तुम्ही आईला मारूनच टाकले. आता आई देवाघरी गेली आणि तुम्ही कोठडीत. तुमच्या भांडणाची शिक्षा आम्हाला का? हा प्रश्न आहे आठ वर्षांच्या स्वरा आणि चार वर्षांच्या श्री या चिमुकल्यांचा.
भलेही त्यांना नीट शब्दांत मांडता येत नसेल; पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भेदरलेले भाव मनातील कालवाकालव स्पष्टपणे सांगत आहेत. आईच्या कुशीत सुरक्षित भविष्य पाहणाऱ्या अन् बाबांच्या हाताला धरून जग समजून घेणाऱ्या चिमुकल्यांच्या आयुष्याची दिशाच भरकटली आहे. पाचगाव येथील खुनाच्या घटनेनंतर शून्यात हरवलेल्या या चिमुकल्यांचा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे.
पाचगावातील योगेश्वर कॉलनीत चारित्र्याच्या संशयातून गणेश कदम याने पत्नी दीपालीचा खून केल्याच्या घटनेने केवळ एका संसाराचा अंत झालेला नाही, तर दोन चिमुकल्यांच्या आयुष्यावरही कायमचे व्रण उमटले आहेत. आईचा मृत्यू आणि वडिलांवर खुनाचा आरोप, पती-पत्नीमधील संघर्षाची ही रक्तरंजित परिणती मुलांच्या वाट्याला आली आहे. मोठ्यांच्या वादात चिमुकल्यांचे बालपण किती दिवस भरकटत राहणार, या प्रश्नावरची खपली या घटनेने पुन्हा निघाली आहे.
पती-पत्नीतील वाद, हिंसा यांचा फटका मुलांना बसतो. घरातील आरडाओरड, शिवीगाळ, मारामारी आणि सततचा तणाव, यामुळे मुलांच्या मनात भीती आणि असुरक्षितता निर्माण होते. काही मुले शांत होतात, काही आक्रमक बनतात, काही स्वतःमध्येच गुरफटतात. त्याचा परिणाम अभ्यासावर, वर्तनावर आणि नातेसंबंधांवरही होऊ शकतो.
डॉ. कपिल सोनटक्के, मानसोपचार तज्ज्ञ