

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यात आठ तालुक्यांत नव्या बाजार समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. पन्हाळा, शाहूवाडी, कागल, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, चंदगड व आजरा या तालुक्यांत बाजार समित्या होणार आहेत. त्यासाठी सरकारी जमिनी नाममात्र दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
राज्यातील शेतकर्यांनी उत्पादित केलेला शेतमाल योग्य दरात आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्षम विपणन व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बाजार समिती योजनेंतर्गत राज्यातील 21 जिल्ह्यांतील 65 तालुक्यांत नवीन बाजार समित्या स्थापन होणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्तमंत्री अजित पवार यांनी एक तालुका एक बाजार समिती योजनाची घोषणा केली होती. राज्यातील एकूण 358 तालुक्यांपैकी 68 तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नसल्याने राज्य सरकाने आता प्रत्येक तालुक्यासाठी बाजार समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध केला.
नव्याने उभारण्यात येणार्या समित्यापैकी सांगली 3, तर ठाणे, पुणे, नागपूर, गोंदिया, नदिड, बीड, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांमधील प्रत्येकी तालुक्यांत एक तसेच भंडारा, चंद्रपूर, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर येथील तालुक्यांमध्ये प्रत्येकी दोन समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत 5 एकर जागेवर तर उर्वरित जिल्ह्यांतील बाजार समित्या 10 ते 15 एकर जागेवर उभारल्या जाणार आहेत. त्याबाबत सहकारी संस्थांचे सहायक निबंधक व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून महसूल विभागाला प्रस्ताव सादर केला जाणार आहे. पणन संचालक हे बाजार समितीसाठी पायाभूत व तांत्रिक सुविधांबाबत स्थानिक गरजा विचारात घेऊन निकष निश्चित करणार आहेत. बाजार समित्यामध्ये अडते व व्यापार्यांचे परवाने देण्यासंदर्भात सक्षम अधिकार्यांना आदेश देण्यात आले आहेत.