

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केली आहे. या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करा, याबाबत दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करा, उमेदवारांच्या सोयीसाठी ‘एक खिडकी’ पद्धत अंमलात आणा, असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बुधवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विभाग प्रमुखांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी बैठक घेतली.
आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्यावर भर देत, पहिल्या 24, 48 आणि 72 तासांतील कार्यवाहीचे अहवाल सादर करा, असे आदेश देत येडगे म्हणाले, प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर प्रत्येकी तीन स्थिर तपासणी पथके तत्काळ सक्रिय करा. नागरिकांच्या अडचणींसाठी स्वतंत्र आचारसंहिता कक्ष व तक्रार निवारण कक्ष स्थापन करा. उमेदवारांच्या सोयीसाठी ‘एक खिडकी’ पद्धत अंमलात आणून, सर्व प्रकारचे विविध परवाने एकाच ठिकाणी मिळण्याची व्यवस्था करा, असे सांगत ते म्हणाले, राजकीय प्रचारासाठी जाहिरात पूर्व प्रमाणन व पेड न्यूजसाठी जिल्हास्तरावर जिल्हा माहिती कार्यालयात माध्यम कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
आचारसंहितेच्या काळात मतदारांवर प्रभाव पाडणार्या कोणत्याही नवीन शासकीय घोषणा करण्यास मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणचे जाहिरातींचे फलक झाकणे आणि प्रचार साहित्याबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवरील किमान आवश्यक सुविधांची पाहणी करून दोन दिवसांत अहवाल सादर करावा. यासोबतच नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया शिस्तबद्ध राबविणे, मतदान यंत्रांची प्राथमिक चाचणी करणे आणि यंत्रांच्या वाहतुकीबाबत संबंधित राजकीय पक्षांना पूर्वकल्पना देऊन अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीला उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेसाठी मतदार संघात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यामुळे कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू राहणार नाही. या ठिकाणी आचारसंहिता लागू नसली तरी तेथेही कोणतीही नवी घोषणा करता येणार नाही. तसेच, शासकीय अधिकारी आणि कर्मचार्यांनी कोणत्याही राजकीय प्रचारात सहभागी होऊ नये, असेही आदेश यावेळी प्रशासनाने बजावले आहे.