कोल्हापूर : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी मंगळवारी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव उपस्थित होते.
डॉ. राठोड यांनी मंगळवारी दैनिक ‘पुढारी’च्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. डॉ. प्रतापसिंह जाधव, डॉ. योगेश जाधव यांची त्यांनी भेट घेत जिल्ह्यातील सध्याची पाणी टंचाई, त्यावरील उपाय योजना, शेतीसाठी लागणारे पाणी, त्याची उपलब्धता, त्यानुसार पाण्याचा कमीत कमी वापर, त्याकरीता प्रगत पद्धतींचा वापर, नदीजोड प्रकल्प आदी विषयांवर सविस्तर चर्चा केली.
डॉ. जाधव यांनी दैनिक ‘पुढारी’ची सामाजिक जाणिवेतून झालेली जडणघडण आणि त्यातून ‘पुढारी’ने सामाजिक क्षेत्रात केलेले उत्तुंग कार्य याबाबतची माहिती देतानाच जगातील सर्वोच्च रणभूमीवर भारतीय सैन्यदलासाठी उभारलेले सियाचीन हॉस्पिटल यांचा रोमांचकारी इतिहास सांगितला. करवीर निवासिनी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा प्रारंभ, दख्खनचा राजा जोतिबा मंदिर आणि परिसराचा केलेला विकास, सीमा प्रश्नासाठीची लढाई, दलित उद्धारक कार्य आदींसह पत्रकारितेतून समाजासाठी ‘पुढारी’ने दिलेल्या विविध क्षेत्रांतील योगदान डॉ. राठोड यांनी जाणून घेतले.