नेसरी : माझे उपमुख्यमंत्रिपदाचे रेकॉर्ड कुणीही मोडू शकणार नाही. विरोधक राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत गैरसमज पसरवत असून, मी काय आज सरकार चालवत नसून, तिथे गोट्या खेळायला गेलो नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. नेसरी येथे आयोजित जनसन्मान यात्रेदरम्यान जाहीर सभेत ते बोलत होते.
केंद्राची व राज्याची सांगड असेल, तर प्रचंड विकास होतो. आंध्र प्रदेश आणि बिहार राज्याला याचा प्रचंड फायदा झाला आहे. तसाच फायदा उठवायचा असेल, तर पुन्हा एकदा महायुतीला साथ द्या. चंदगडमध्ये आपला प्रतिनिधी निवडून मतदारसंघात निधी मिळवताना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा फायदा उठवा, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले. जयसिंग चव्हाण यांनी स्वागत केले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, आ. राजेश पाटील यांनी केवळ तीन वर्षांत 1,600 कोटींचा निधी आणला आहे. पुन्हा एकदा आमदार झाल्यानंतर त्यांना दुप्पट निधी देऊ, असे पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, नाविद मुश्रीफ, अल्बर्ट डिसोझा, चंदगडच्या नगराध्यक्षा प्राची काणेकर, भिकू गावडे, सुधीर देसाई, अभिषेक डोंगळे, दयानंद काणेकर, पांडुरंग बेनके, मुन्ना नाईकवाडी, अमर हिडदुगी, ज्योतिबा भिकले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभय देसाई यांनी आभार मानले.
आ. राजेश पाटील म्हणाले, राज्य सरकारच्या कोट्यवधीच्या योजना उपमुख्यमंत्री पवार यांच्या माध्यमातून चंदगड मतदारसंघात आल्या आहेत. विरोधकांनी केलेल्या विखारी प्रचाराला जनता मतदानातून उत्तर देईल. जोपर्यंत अजित पवार यांचे आशीर्वाद चंदगडच्या पाठीशी आहेत, तोपर्यंत विकास निधी कमी पडणार नाही.