

कोल्हापूर : कोल्हापूर विभागीय आयुक्त कार्यालयाबाबत पुढील वर्षी निर्णय घेतला जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सध्या जनगणना सुरू आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर राज्यातील महसूल विभाजनाचा निर्णय होईल. यावेळी पश्चिम महाराष्ट्राचाही प्राधान्याने विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री बावनकुळे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यातील सर्व जनता सुखी आणि समृद्ध राहो, ज्या ज्या भागात पाऊस झालेला नाही, तिथे चांगला पाऊस होवो, त्यातून शेतकऱ्यांसह सर्वांच्याच घरात समृद्धी येवो, अशी प्रार्थना अंबाबाई चरणी केली. कोल्हापूरला विभागीय आयुक्त कार्यालय व्हावे अशी मागणी होत आहे. याबाबत विचारता बावनकुळे म्हणाले, राज्यात महसूलचे सहा विभाग आहेत. त्यापैकी काही विभागांतील जिल्ह्यांची संख्या अधिक आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात तर आठ जिल्हे आहेत. यामुळे या ठिकाणीही विभाजनाची मागणी आहे.
नांदेड किंवा लातूर येथे विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत मागणी आहे. त्याच पद्वतीने पश्चिम महाराष्ट्रातही विभाजन करण्याचा विचार आहे. कोल्हापूरला खंडपीठही सुरू होत आहे. याबाबत जनगणना पूर्ण झाल्यानंतर व त्याचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
बनावट सही-शिक्के प्रकरणाची सखोल चौकशी करणार
करवीर तहसीलदारांचा बनावट सही-शिक्के वापरून आदेश दिेल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करू, आपल्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे केले काय याचीही पडताळणी केली जाईल. यामध्ये कोणी जाणीवपूर्वक विलंब केला असेल तर त्यालाही कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.