

कोल्हापूर : सरकारी शाळांमधील मुलांची संख्या घटत चालली असताना महानगरपालिकेच्या जरगनगर येथील शाळेत गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुलाचे नाव शाळेत नोंदविण्यासाठी पालकांनी प्रवेशासाठी शनिवारी सकाळपासूनच केलेली गर्दी निश्चितच सरकारी शाळांसाठी सुखकारक अनुभव आहे. येथील शिक्षकांनी शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेबरोबरच स्थानिक नागरिकांचे असलेले सहकार्य यामुळेच या शाळेत प्रवेशासाठी गर्दी होत आहे.
महानगरपालिकेसह अन्य सरकारी शाळांबद्दल आजही पालकांच्या मनामध्ये या शाळांमध्ये आपल्या मुलाला प्रवेश घेण्यासाठी नापसंती असते. परंतु महापलिकेच्या काही शाळा त्याला अपवाद आहे. त्यामध्ये जरगनगर येथील महापालिकेची श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाची जरग विद्यामंदिर येथील शाळेचा समावेश आहे. या शाळेने आपली विश्वासर्हता निर्माण केली आहे. त्याचे संपूर्ण श्रेय येथील शिक्षकांचे आहे.
शाळेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेची करून घेण्यात येत असलेल्या तयारीमुळे या परीक्षेत जरगनगर शाळेतील विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत दरवर्षी येत असतात. यामुळे शाळेने एक आदर्श निर्माण केला असल्यामुळे या शाळेकडे पालकांचा ओढा दरवर्षी वाढत आहे. पाडव्याच्या दिवशीच या शाळेतील प्रवेश फुल्ल होत असतो. यावर्षी देखील पहिलीच्या प्रवेशासाठी सकाळपासून शाळेच्या आवारात गर्दी झाली होती. आलेल्या पालकांना रात्री नऊ वाजता टोकन देण्यात आले.