सैनिक टाकळी : काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीला महापूर आला आहे. या महापुरामुळे मनुष्य प्राण्यांनी केलेल्या स्थलांतराप्रमाणे जलचर प्राणी ही स्थलांतर करत आहेत. सैनिक टाकळी येथील नदीपात्रात कित्येक वर्षापासून अनेक मगरींचा वावर आहे.
शिरोळ तालुक्यातील राजापूरवाडी येथील सायंकाळी नागरिक अनिकेत चिमाई व शुभम कदम, हे पशु छावणी कडून राजापूरवाडी येथील बंद असलेल्या घराच्या पाहणीसाठी जात असताना अचानक रस्त्याकडे त्यांना मगर निदर्शनास आली. तात्काळ त्यांनी त्या मगरीचे चित्रीकरण केले. सध्या राजापूरवाडी येथे ६०ते ७० नागरिक अद्याप वास्तव्य करत असून ते स्थलांतरित झालेले नाहीत. तसेच किमान 30 जनावरे स्थलांतरित झालेली नाहीत. कित्येक वर्षापासून नदीपात्रात असणाऱ्या मगरीने महापुरामुळे आपली जागा सोडली असून त्यांनी नागरी वस्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. अशा पात्र सोडून गावच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मगरीचा जनावरे व मानवाच्या जीवितास धोका होऊ शकतो. यामुळे वन विभागाकडून याची दखल घेणे गरजेचे आहे.