

कोल्हापूर : कोल्हापुरात गणेशोत्सव शिस्तबद्धरीत्या साजरा करण्यासाठी स्थापन झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव महासमितीच्या पदाधिकाऱ्यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीपूर्वी किमान एक महिना अगोदर ड्रॉ काढावा, अशी मागणी केली आहे. यामुळे ज्या मंडळाचा मिरवणुकीत शेवटी क्रमांक येईल ते मंडळ आपली रोषणाई व साऊंड सिस्टीम रद्द करून ती रक्कम सामाजिक कार्याकडे वळवतील, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
ऐनवेळी हा ड्रॉ काढला जातो. त्यापूर्वीच सर्व मंडळांनी आपली साऊंड सिस्टीम, रोषणाई व सजावट ठरविलेली असते. मंडळाचा ड्रॉनुसार क्रमांक शेवटी येत असल्यास मंडळाच्या या साऊंड सिस्टीम व रोषणाई, सजावटीचा खर्च वाया जातो. हा खर्च वाचविणे व तो विधायक कार्याकडे वळविणे शक्य आहे; मात्र त्यासाठी पोलिसांचे सहकार्य आवश्यक असल्याची अपेक्षा महासमितीने व्यक्त केली आहे. हा खर्च विधायक कार्याकडे वळविण्यासाठी पोलिसांनी यासंदर्भातील ड्रॉ हा एक महिना अगोदर काढावा. ज्या मंडळाना त्यानुसार वाटचाल करायची असेल, ते करतील; मात्र ज्या मंडळांचा क्रमांक शेवटी येणार असेल, तर ते मंडळ आपला साऊंड सिस्टीम व सजावटीचा खर्च कमी करून तो अन्य विधायक व सामाजिक कार्याकडे वळवतील, असे महासमितीने म्हटले आहे.
लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष
आता यासंदर्भात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पालकमंत्री तसेच जिल्हा प्रशासन व पोलिस दल कोणती भूमिका घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
डॉल्बी बाबत तालीम मंडळानी स्वत:ची आचारसंहिता काटेकोरपणे पाळण्याचे आवाहनही महासमितीने केले आहे. (पूर्वार्ध)
मंडळांसाठी आचारसंहिता
मंडळांनीही मर्यादित आवाज ठेवून चांगली गाणी वाजवावीत. एक गाणे झाल्यानंतर ५० मीटर पुढे जावे, लाईट इफेक्ट योग्य वापराव्यात. साऊंड सिस्टीम मालक, तालीम व मंडळांचे प्रतिनिधी व महासमिती सदस्यांची एकत्रित बैठक जिल्हा प्रशासनाने घ्यावी. प्रत्येक तालीम मंडळांनी आचारसंहिता पाळावी, गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन देखावे पहाण्यासाठीची वेळ मध्यरात्री दोन वाजेपर्यंत वाढविण्यात यावी, वीज मंडळाने वायरी उंच करणे, त्याची सुरक्षितता पाहणे ही कामे करून मंडळानी भरलेले डीपॉझिट परत करावे, या मागण्याही महासमितीने केल्या आहेत.