

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रस्ते चांगले व सुस्थितीत असावेत याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे. त्यासाठी वारंवार महापालिका प्रशासनासोबत बैठका, तसेच सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. काँग््रेास काळात बंद पडलेला महापालिकेचा डांबरी प्रकल्पही निधी देऊन पूर्ण क्षमतेने सुरू केला आहे. त्यामुळे महिना अखेरपर्यंत शहरातील रस्ते दर्जेदार आणि सुस्थितीत होतील, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
निवृत्ती चौकात झालेल्या एका कार्यक्रमात आ. क्षीरसागर बोलत होते. ते म्हणाले, गेल्या काही वर्षांत रस्त्यांची झालेली दुरवस्था सुधारण्यात बऱ्याच अंशी यश आले आहे. नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या आरोग्यासाठी रस्ते सुस्थितीत असणे गरजेचे आहे. खराब रस्त्यांमुळे कोल्हापूरचे नाव बदनाम होत होते, पण गेल्या दोन महिन्यांत घेतलेल्या आग्रही भूमिकेमुळे शहरातील रस्ते सुस्थितीत व दर्जेदार होताना दिसत आहेत. त्यासाठी विविध माध्यमातून निधीची तरतूदही करण्यात येत आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख रणजित जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, अजय इंगवले, प्रसाद चव्हाण, सुनील भोसले, विश्वदीप साळोखे, कपिल सरनाईक, युवराज अपराध यांच्यासह इतर उपस्थित होते.