

कोल्हापूर : राज्य ग्राहक आयोगाच्या (ग्राहक न्यायालय) कोल्हापूर येथील कायमस्वरूपी खंडपीठासाठी आग्रही राहू, अशी ग्वाही मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांनी दिली. याबाबतचा निर्णय झाल्यास सहा जिल्ह्यांतील तक्रारदारांना दिलासा मिळणार आहे.
सर्किट बेंचच्या कामकाजासाठी दोन दिवसांच्या दौर्यावर आलेल्या मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांचे जिल्हा ग्राहक वाद आयोग व कोल्हापूर जिल्हा ग्राहक बार असोसिएशनच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी राज्य ग्राहक वाद आयोगाचे 2015 पासून कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर या जिल्ह्यांसाठी सर्किट बेंच कोल्हापूर येथे सुरू आहे. दर दोन महिन्यांनी एका आठवड्याकरिता येथे सुनावणी होत असल्याने दाखल तक्रारींचा गतीने निपटारा होण्यासाठी कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे रूपांतर कायमस्वरूपी खंडपीठात करावे, या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हा ग्राहक वाद आयोगचे अध्यक्ष प्रवीण खोत, सदस्य चंद्रकांत निचल, जिल्हा ग्राहक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रताप जाधव, उपाध्यक्ष अॅड. संदीप जाधव, महिला प्रतिनिधी सौ. अथणे, खजानीस अॅड. अशिष भुमकर, अॅड. दिग्विजय जाधव, अॅड. आळवेकर, अॅड. संतोष तावदारे, अॅड. दीपाली देसाई, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. संपतराव पवार, अॅड. एस. के. दंडगे, अॅड. कोळेकर उपस्थित होते.