कोल्हापूर : देशभरात झालेल्या रविवारी (दि. 3) नीट 2026 (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेत कोल्हापूर आणि इचलकरंजी येथे काही केंद्रांवर गोंधळ उडाला.
इचलकरंजी येथील एएससी कॉलेज केंद्रावर पाण्याची बाटली आणण्यासाठी बाहेर गेलेल्या विद्यार्थ्याला पुन्हा परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला नाही. तर कोल्हापूर शहरातील एका केंद्रावर तपासणी प्रक्रिया रेंगाळल्याने विद्यार्थ्यांचा 10 मिनिटांचा वेळ वाया गेल्याची तक्रार पालकांनी केली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा गंभीर आरोप पालकांकडून करण्यात आला आहे.
कोल्हापुरात या परीक्षेसाठी 13 केंद्रे होती. सुमारे 6 हजारहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. देशभरात सुमारे 22 लाख 79 हजार विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी सुमारे 22 लाख 9 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
बायोमेट्रिक झाले, मग तो बाहेर कसा गेला?
इचलकरंजीतील त्या विद्यार्थ्याने बायोमेट्रिक पूर्ण झाल्यानंतर तो बाहेर कसा गेला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बायोमेट्रिक झाल्यानंतर विद्यार्थ्याला पुन्हा प्रवेश देणे अपेक्षित असताना तो नाकारल्याने संताप व्यक्त होत आहे. काही केंद्रांवर तपासणी, महिती भरणे या प्रक्रियेला विलंब झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.