

कोल्हापूर : बळीराजाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेऊन कर्जमाफी आणि थकीत वीज बिल माफी करण्यात आली आहे. यामुळे ५६ लाख शेतकरी कर्जमुक्त झाले, तर ४८ हजार कोटी रुपयांची थकीत वीज बिले माफ झाली आहेत. या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री पाटील म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंत वीज मोफत दिली जात आहे. मात्र, जुनी ४८ हजार कोटींची थकबाकी माफ केल्यामुळे शेतकऱ्यांच्या वीज बिलाची पाटी पूर्णपणे कोरी होणार आहे. यावेळी आमदार अमल महाडिक, भाजपचे प्रदेशसचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर उपस्थित होते.
जंतर-मंतरवरील दगडफेकीतील दगडावर असणारे फिंगरप्रिंट आधार कार्डशी मॅच करून शोध घेणार
जंतर-मंतरवरील दगडफेकीतील दगडांवरील फिंगरप्रिंटस् आधार कार्डशी लिंक करून शोध घेतला जाणार आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी तयार केलेला अहवाल पाहिल्यास कोणालाही चक्कर येईल, असा दावा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. मंत्री पाटील म्हणाले, आंदोलनाबाबत पोलिसांनी एक धक्कादायक आणि विस्तृत अहवाल तयार केला आहे. अहवालानुसार या आंदोलनावेळी झालेल्या दगडफेकीतील प्रत्येक दगड पोलिसांनी गोळा केला असून, त्यावरील फिंगरप्रिंटस् आता ‘आधार’ कार्डशी लिंक केले जाणार आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत मंत्री पाटील म्हणाले, लोकशाहीत आरोप करण्याचा अधिकार सर्वांना आहे; पण ते आरोप खरेच असतात असे नाही.
‘गोकुळ’ निवडणूक घेण्याचा अधिकार प्राधिकरणाचा
गोकुळ दूध संघाची निवडणूक घेण्याचा अधिकार प्राधिकरणाचा आहे. सहकार खाते विविध न्यायालयांत असणाऱ्या प्रकरणाचा अभ्यास करून प्राधिकरण त्याबाबत निर्णय घेईल. असे सांगून मंत्री पाटील म्हणाले, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरोप सिद्ध करावेत. आरोप करण्याचा अधिकार प्रत्येकास आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी वीज बिल थकबाकीसह महावितरणचा भ्रष्टाचार सिद्ध करावा.