इचलकरंजी : उद्धव ठाकरे यांच्या सत्ताकाळात मोदी सरकारच्या कल्याणकारी 18 योजना बंद पाडण्यात आल्या. मात्र महायुतीच्या काळात ‘लाडकी बहीण’सह अन्य अनेक कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. काँग्रेस प्रणीत सरकार आहे तिथे अनेक योजना बंद केल्या गेल्या. मात्र महायुतीच्या काळात सर्व कल्याणकारी योजना पुढेही सुरूच राहतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे व्यक्त केला. मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांना कटोरा घेऊन फिरण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी महाविकास आघाडीत स्पर्धा आहे. मात्र राज्याच्या विकासासाठी महायुतीचाच मुख्यमंत्री हवा, असेही त्यांनी नमूद केले.
इचलकरंजीत भाजप कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यासाठी बावनकुळे गुरुवारी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राहुल गांधी निवडणूक प्रचारावेळी खटाखट निधी देणार, असे म्हणत होते. मात्र तेही आता खोटे निघाले आहे. सध्या राज्यातील महायुती तसेच केंद्र सरकारच्या अनेक चांगल्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या योजना आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी डबल इंजिन सरकारची राज्याला गरज आहे.
काँग्रेसकडून डझनभर इच्छुक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धा रंगली आहे. मात्र महायुती राज्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ता मागत आहे. डबल इंजिन सरकारमुळे राज्यातील महिलांसह शेतकर्यांसाठीच्या विविध योजना पुढे सुरू राहतील आणि राज्याचे हित साधले जाईल, असेही बावनकुळे म्हणाले. भाजपच्या काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट होणार अशी अफवा पसरवण्यात आली आहे. मात्र पक्षीय पातळीवर तशी कोणतीही चर्चा नाही. केंद्रीय निवडणूक समितीच उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. तेच योग्य माहिती देतील. या सर्व कथित बातम्या आहेत. भाजप तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्या जागा त्यांनाच मिळतील. उर्वरित जागांवर पुन्हा लवकरच बैठक होईल. जिंकण्यासाठी आम्ही महायुती म्हणून एकत्रित लढू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महायुतीला यश मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनीही जोमाने कामाला लागावे. राज्यातही महायुतीचे सरकार आणि मुख्यमंत्री असेल तर राज्याचा विकास होईल. यासाठी साथ द्यावी, असे आवाहनही बावनकुळे यांनी केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खा. धनंजय महाडिक, माजी आ. सुरेश हाळवणकर, माजी आ. संजय पाटील आदी उपस्थित होते.