

कोल्हापूर : 488 कोटींची थेट पाईपलाईन योजना तांत्रिकदृष्ट्या बंद पाडून काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांना बदनाम करण्याचे षडयंत्र भाजपने रचले आहे. या षडयंत्रात महापालिका आयुक्तांसह इतर अधिकारीही सहभागी आहेत, असा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर भूपाल शेटे, दुर्वास कदम यांच्यासह शिष्ठमंडळाने महापालिकेत केला. महापालिकेत थेट पाईपलाईनसंदर्भात शिष्ठमंडळाने अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांना निवेदन दिले.
सचिन चव्हाण म्हणाले, काँग्रेसची सत्ता असलेल्या सभागृहाने 500 कोटींच्या योजनेत कुणालाही टक्केवारी घेऊ द्यायची नाही, अशी शपथ घेतली होती. आता रस्त्यासाठी 20 ते 25 टक्के टक्केवारी घेतली जात आहे, तशी भानगड केली नाही. दुर्वास कदम म्हणाले, पाटील यांना बदनाम करण्यासाठी अधिकार्यांनी सुपारी घेतली आहे. त्यासाठी थेट पाईप लाईन योजना कुचकामी असल्याचे दाखविण्याचा अधिकारी प्रयत्न करत आहेत. अधिकारी, प्रशासनाचा आम्ही निषेध करतो.
मधुकर रामाणे यांनी कळंबा तलावातून पाणी पुरवठा बंद का केला? असा प्रश्न उपस्थित केला. राजाराम गायकवाड यांनी शहरवासियांना पाण्यापासून वंचित ठेवण्यापेक्षा शिंगणापूर योजना सुरू का ठेवत नाही? अशी विचारणा केली. यावेळी सागर यवलुजे, प्रताप जाधव, वैशाली महाडीक यांच्यासह इतर उपस्थित होते.
भूपाल शेटे यांनी, सुस्थितीतील योजनेत तांत्रिक बिघाड करून ती निकृष्ट असल्याचे दाखविण्यासाठी अधिकार्यांची धडपड सुरू आहे. नवीन एक हजार कोटींची योजना आणून त्यातील 30 ते 35 टक्के ढपला पाडण्यासाठी थेट पाईपलाईन योजना बंद पाडण्याचे कारस्थान भाजपच्या लोकप्रतिनिधींनी रचले आहे. आयुक्तांसह इतर अधिकार्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशाराही दिला.