

शिवराज सावंत
फुलेवाडी : कोल्हापूर शहरातील व उपनगर परिसरातील अनेक रस्ते खड्डेमय तसेच बकाल झाले आहेत. अशा परिस्थितीत ताराबाई रोडवर सुस्थितीत असलेल्या रस्त्यावरच पुन्हा डांबरीकरण होत असल्यामुळे नागरिक तीव— संताप व्यक्त करीत आहेत.
महालक्ष्मी मंदिर ते रंकाळा चौपाटी कमान ताराबाई रोडवरील मुख्य रस्त्यासाठी जवळपास तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे; पण कपिलतीर्थ मार्केटपासून तटाकडील तालीम हा साधारणतः 40 मीटरचा रस्ता खराब झालेला आहे; पण इतर सर्वच रस्ता सुस्थितीत आहे, तरीही रातोरात या रस्त्याचे डांबरीकरण वेगाने चालू आहे. नागरिक याबाबत आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
शहर परिसरात व उपनगरात अनेक ठिकाणी 20 वर्षांपासून रस्ते झालेले नाहीत. बर्याच ठिकाणी रस्त्यावरच्या खड्ड्यात पडून नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. एकीकडे नागरिक खराब रस्ते डांबरीकरण करण्यासाठी निवेदने देताहेत. रास्ता रोको आंदोलन करीत आहेत. दुसरीकडे निधी खर्च करण्यासाठी चांगले डांबरीकरण असलेल्या रस्त्यावरच परत डांबरीकरण होत असल्यामुळे नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. तसेच गांधी मैदानाकडून दुधाळीकडे वळवण्यात आलेल्या सांडपाण्याच्य नाल्याचे अजून काम पूर्ण झालेली नाही.
साकोली कॉर्नर चौक परिसरात या रस्त्यावर क्रॉस नाला जोडण्याचे काम अजून व्हायचे आहे. त्या परिसरातदेखील डांबरीकरण केल्यामुळे क्रॉस नाल्याचे काम करताना या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदाई केली जाणार आहे. एकीकडे उभा मारुती चौक ते साकोली कॉर्नर परिसरातील नागरिक सांडपाण्याचे गटार पूर्ण करून रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी करत आहेत. या परिसरातील नागरिकांचे धुळीमुळे हाल होत आहेत.