

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या जतन व संवर्धन कामात महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातत्त्व स्थळे व अवशेष कायद्यातील निकषांना धाब्यावर बसवण्यात आले आहे. सध्या मंदिरात सुरू असलेले काम अत्यंत चुकीचे व मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीने केला. मशिनचा वापर करून मंदिराचे मूळ रूप नष्ट केले जात असून यामध्ये दोषी असलेल्या पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी मंदिराच्या छताला गळती लागल्याच्या पार्श्वभूमीवर संवर्धनकामातील त्रुटींबाबत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. २२) झालेल्या बैठकीत वादळी चर्चा झाली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला. हर्षल सुर्वे यांनी चुकीच्या पद्धतीने संवर्धनाचे काम सुरू असल्याचे सांगितले. संवर्धनाच्या नावावर अत्यंत बेजबाबदार काम सुरू असून अंबाबाईचा इतिहास पुसून टाकणाऱ्या देवस्थान समिती, कर्मचारी, ठेकेदार, पुरातत्त्वचे अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असा मुद्दा मांडला.
ॲड. प्रसन्न मालेकर यांनी सांगितले की, संवर्धनसाठी सँड प्रेशर प्रक्रिया अत्यंत धोकादायक असून त्यामुळे मंदिराचे मूळ दगडी सौंदर्य तसेच शिलालेख यावर परिणाम झाला आहे. तसेच दरवर्षी होणाऱ्या मूर्ती संवर्धनावेळी धार्मिक विधी योग्यरीत्या होत नाहीत. मातृलिंगावर दगडाचा थर झाला आहे. महाकाली, महासरस्वतींच्या मूर्तींचे पावित्र्य धोक्यात आले आहे. पुढील ३० वर्षांतील झीज ३० दिवसांत झाल्याचे सांगत बाबा इंदुलकर यांनी दगडाला चिरा व छिद्रे पडल्याने झालेले नुकसान कोण भरून देणार, असा सवाल उपस्थित केला. मंदिराचे संवर्धन अवैज्ञानिकरीत्या सुरू असून मंदिर विद्रुप करण्याचा प्रकार बंद करण्याची मागणी केली. नियमानुसार ग्राइंडर वापरण्यास मद्रास न्यायालयाने बंदी आदेश दिला असताना कटरचा वापर बेकायदेशीर असल्याचे गजानन तोडकर यांनी सांगितले. संवर्धन कामावर देखरेख करण्यासाठी सक्षम अधिकारी कायम उपस्थित असणे आवश्यक असल्याचे म्हणणे इंद्रजित सावंत यांनी मांडले.
हौद रातोरात का हटवला? कळस रात्री का बसवला?
मंदिर आवारातील पुरातन कारंजाजवळील हौद एका रात्रीत कुणाच्या परवानगीने हटवला, या मुद्द्यावरून बैठकीत वादळी चर्चा झाली. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा परिसर रिकामा ठेवण्यासाठी ही प्रक्रिया केल्याचे कंत्राटदार स्मिता कासार यांनी सांगताच समिती सदस्यांनी हा मुद्दा खोडून काढल्याने बैठकीत गोंधळ झाला. मंदिराच्या शिखरावर सोन्याचा कळस कोणताही धार्मिक विधी न करता एका रात्रीत का बसवला, या प्रश्नावरूनही बैठकीत खडाजंगी झाली.