

कोल्हापूर : अलमट्टी धरणाची पाणी पातळी 15 ऑगस्टपर्यंत 517 मीटरपर्यंतच ठेवा, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी बागलकोट जिल्हा प्रशासनाला केली. पावसाळ्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरनियंत्रणासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात पाणी विसर्गाबाबत समन्वय ठेवण्याचा निर्णय गुरुवारी जिल्हाधिकार्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटकातील बेळगाव व बागलकोट जिल्हाधिकार्यांची गुरुवारी सायंकाळी ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीला कारणीभूत ठरणार्या अलमट्टी आणि हिप्परगी धरणांतील पाणी विसर्गाबाबत चर्चा करण्यात आली. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील सर्व डेटा तसेच अलमट्टी, हिप्परगीतील विसर्गाची माहिती वेळेवर एकमेकांना देण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, पावसाळ्याच्या कालावधीत हिप्परगीचे सर्व दरवाजे उघडलेले असणे आवश्यक आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून चांगला समन्वय झाला आहे. बागलकोटचे जिल्हाधिकारी तथा उपायुक्त संगप्पा म्हणाले, दैनंदिन सर्व डेटा शेअर झाल्यास नियोजन करणे सोयीचे होणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, महाराष्ट्र आणि कर्नाटक आंतरराज्य बैठकीत यापूर्वी ठरलेल्या धोरणांनुसार अलमट्टीतील पातळी नियंत्रित ठेवली पाहिजे. 15 ऑगस्टपर्यंत पातळी 517 मीटरपर्यंतच असावी आणि हिप्परगीतील विसर्गही सुरूच ठेवावा लागेल.