

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापूर नियंत्रणासाठी १५ ऑगस्टपर्यंत अलमट्टी धरणाची पाणी पातळी ५१७ ते ५१७.५० मीटरपर्यंत ठेवण्याचा निर्णय यापूर्वी झालेला आहे. मंगळवारी सकाळी धरणाने ५१७.३७ मीटर इतकी पाणी पातळी गाठली. धरण ७२.४७ टक्के भरले असून धरणात ८९.१४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जुलै, ऑगस्टमध्ये जोरदार पाऊस झाला, तर अलमट्टीने आताच गाठलेली ही पाणी पातळी जिल्ह्यासाठी चिंता वाढवणारी ठरण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी अलमट्टी धरणाची पाणी पातळी दरवर्षी १५ ऑगस्टपर्यंत ५१७ मीटर ते ५१७.५० मीटरदरम्यान राखण्याचा निर्णय झाला आहे. कर्नाटक प्रशासनाने या निर्णयाला मान्यता दिली. अलमट्टीची पाणी पातळी ५१७ मीटरपुढे गेली आणि पावसाचे प्रमाण वाढले, तर कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यालाही महापुराचा फटका बसतो. अलमट्टी धरणाची पूर्ण क्षमता ५१९ मीटर (१२३ टीएमसी) आहे. धरणात दि. ४ जुलै रोजी पाणी पातळी ५०७.८० मीटर होती, तर धरणात २०.६८ टीएमसी साठा होता.