

कोल्हापूर : अलमट्टी धरणाची पाणी पातळी १५ ऑगस्टपर्यंत ५१७ ते ५१७.५० मीटरपर्यंत ठेवण्याचा निर्णय झाला आहे; मात्र जुलैमध्येच धरणातील पातळी ५१९ मीटवर गेली आहे. कर्नाटककडून पातळी मर्यादेचे उल्लघंन सुरूच आहे. वाढलेल्या या पाणी पातळीने कोल्हापूर-सांगलीला महापुराचा असलेल्या धोका मात्र, कायम आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी अलमट्टी धरणात कृष्णा नदीतून ७३ हजार ४६१ क्युसेक पाणी येत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ सुरूच आहे. सोमवारी सकाळी या धरणाची पातळी ५१९.१२ मीटरवर पोहोचली.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दरवर्षी १५ ऑगस्टपर्यंत अलमट्टीची पातळी ५१७ ते ५१७.५० मीटरपर्यंतच ठेवण्याचा निर्णय आंतरराज्य समन्वय समितीच्या बैठकीत यापूर्वीच झाला आहे; मात्र सध्या पाऊस कमी झाल्याने अलमट्टीत मर्यादेपेक्षा जास्त पाणीसाठा केला जात आहे. या धरणात सध्या ११४.८९ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ९३.३५ टक्के भरले आहे.
..तर दोन-तीन दिवसांतच परिस्थिती नियंत्रणाबाहेर
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात सध्या पावसाने ओढ दिली आहे; मात्र कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील धरणे ७०-८० टक्क्यांहून अधिक भरली आहेत. यामुळे अचानक पावसाचा जोर वाढला, तर दोन-तीन दिवसांतच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर अलमट्टीची ५१७ मीटरवर गेलेल्या पाणी पातळीने कोल्हापूर-सांगलीच्या महापुराचा धोका कायम आहे.