

जयसिंगपूर/शिरोळ : कोल्हापुरात बैठक झाल्यानंतर सर्व लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी नांदणी मठात येऊन महास्वामी यांच्या उपस्थितीत ‘माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण’ परत आणण्याची शपथ घेतली.
कोल्हापुरात शुक्रवारी दुपारी बैठक झाल्यानंतर स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी नांदणी मठात आले. त्यानंतर स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या समवेत कामगारमंत्री सुरेश खाडे, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. अशोकराव माने, आमदार सत्यजित देशमुख, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, उद्योगपती अण्णासाहेब चकोते, भाजपाचे नेते सावकार मादनाईक, संजय पाटील-यड्रावकर, दक्षिण सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, रावसाहेब पाटील, कृष्णराज महाडिक यांची तब्बल 3 तास बंद खोलीत चर्चा झाली.
दरम्यान, कोल्हापुरात काय निर्णय झाला? पुढील दिशा काय असणार? हे जाणून घेण्यासाठी राज्यासह सीमाभागातून शेकडो नागरिक नांदणी मठात दाखल झाले होते. तसेच बंद खोलीत काय चर्चा झाली यांची सर्वांना उत्सुकता लागली होती. अखेर रात्री 8 च्या सुमारास स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी धर्मसभास्थळी आले. यावेळी महास्वामी बोलत होते. महास्वामी पुढे म्हणाले, माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण विषय सर्व धर्मीय नागरिकांनी उचलून धरला असून, हा विषय देश पातळीवरील बनला आहे. त्यामुळे जोपर्यंत न्यायालयीन बाबीची पूर्तता पूर्ण होऊन सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत सर्व धर्मीयांनी संयम राखवा, असे अवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. सागर पाटील, सागर संभुशेट्टे, धनंजय टारे, विशाल चौगुुले, राहुल बंडगर, राजेंद्र झेले, संतोष खामकर, जोतिराम जाधव, नितीन बागे, शेखर पाटील यांच्यासह सर्वधर्मीय पदाधिकारी व नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.