

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) आगामी निवडणुकीसाठी संचालक मंडळ निवड प्रक्रियेत दाखल झालेल्या ठरावांची संख्या ८४ वर पोहोचली आहे. दि. १५ जून २०२६ अखेर तालुकानिहाय प्राप्त झालेल्या ठरावांच्या आकडेवारीनुसार आजरा तालुक्यातून सर्वाधिक १९ ठराव दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ करवीर तालुक्यातून २२ ठराव दाखल झाले आहेत.
तालुकानिहाय आकडेवारीनुसार करवीरमधून २२, आजरा १९, गडहिंग्लज १७, चंदगड ७, हातकणंगले ८, कागल १, गगनबावडा १, पन्हाळा १, भुदरगड २, राधानगरी २, शाहूवाडी २ आणि शिरोळ तालुक्यातून २ ठराव प्राप्त झाले आहेत. गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठरावांची संख्या वाढवण्यासाठी इच्छुकांकडून प्रयत्न सुरू असून, कोणत्या गटाला किती ठरावांचा पाठिंबा मिळतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ठरावांच्या माध्यमातून मतदारसंघातील ताकद दाखवण्याची तयारी विविध गटांकडून सुरू असल्याचे चित्र आहे.
दूध संस्थांची सुनावणी लांबणीवर
दरम्यान, तत्कालीन सहायक निबंधक सुजय कदम यांनी निकाल दिलेल्या २६७ दूध संस्थांच्या प्रकरणांची सुनावणी मुंबई येथे सहनिबंधक प्रज्ञा तायडे यांच्यासमोर सुरू आहे. सोमवारी (दि. १५) आजरा तालुक्यातील २० दूध संस्थांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र सहनिबंधक तायडे रजेवर असल्याने सुनावणी होऊ शकली नाही.
प्रकाश बेलवाडे यांचा पुण्यात ठिय्या
गोकुळ दूध संघ प्रशासनाकडून मागितलेली माहिती मिळत नसल्याच्या निषेधार्थ तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी सोमवारपासून (दि. १५) पुणे येथील विभागीय उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
बेलवाडे यांनी गोकुळच्या विविध कामकाजासंदर्भात माहिती मिळण्यासाठी अर्ज केले होते. याबाबत त्यांनी प्रशासक आणि कार्यकारी संचालक यांनाही पत्र दिले होते. मात्र अद्याप माहिती न दिल्याने आंदोलन सुरू केले. विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी बेलवाडे यांच्याशी चर्चा केली. मागितलेली माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र प्रत्यक्ष माहिती मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका बेलवाडे यांनी घेतली आहे. माहिती न मिळाल्यास पुढील दोन दिवस पुण्यात आंदोलन सुरू ठेवण्यात येईल. त्यानंतर शुक्रवार (दि. १८) पासून कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असे बेलवाडे यांनी सांगितले.