

कोल्हापूर : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर शहरासह जिल्ह्यात पावसाने पुन्हा धुवाँधार कमबॅक केले आहे. शुक्रवारी सकाळपासून शहरात पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाने जोर धरला आहे. राधानगरीसह इतर धरण क्षेत्रांतही पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला असून गेल्या २४ तासांत पाटगाव, घटप्रभा धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली.
पावसाचा जोर वाढल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत दिवसात पाच फुटांची वाढ होऊन पातळी रात्री १२ वाजता १५ फूट ३ इंचावर स्थिरावली. शहरात शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारी साडेतीनच्या सुमारास धुवाँधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर कोसळलेल्या पावसामुळे सखल भागांत पाणीच पाणी झाले होते. पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. इचलकरंजी, बाजार भोगाव, कांटे, करंजफेण, पेंडाखळे, वालोली, यवलूज हे सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत.